१२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनकडे निघालेले एअर इंडिया एआय-१७१ हे विमान काही मिनिटांतच कोसळून भयंकर दुर्घटनेचा शिकार झाले. या अपघातात २४१ प्रवासी आणि क्रू सदस्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अवघा एक प्रवासी विश्वास कुमार रमेश याने मृत्यूला चकवा देत जीव वाचवला. हा विमान अपघात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर घडल्यामुळे संस्थेचेही मोठे नुकसान झाले. या भयंकर आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, टाटा समूहाने एक ऐतिहासिक आणि माणुसकीचा निर्णय घेतला आहे.
टाटा सन्सकडून ‘AI-171 मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्ट’ ची स्थापना
टाटा सन्सने एअर इंडिया अपघातातील बळींच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी ५०० कोटी रुपयांचा सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट स्थापन केला आहे. १८ जुलै २०२५ रोजी मुंबईत या ट्रस्टची अधिकृत नोंदणी झाली असून, या ट्रस्टचे नाव ‘AI-171 मेमोरियल अँड वेलफेअर ट्रस्ट’ असे ठेवण्यात आले आहे. या ट्रस्टसाठी टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट यांनी प्रत्येकी २५० कोटी रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टच्या माध्यमातून अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत, वैद्यकीय उपचार, पुनर्वसन, तसेच स्मृतीस्थळाच्या उभारणीसाठी निधी दिला जाणार आहे.
बळींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटींची आर्थिक मदत
टाटा सन्सने आधीच जाहीर केल्याप्रमाणे, मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची तात्काळ मदत केली जाणार आहे. ही रक्कम केवळ आर्थिक सहाय्य न राहता, त्यांच्या पुनर्रचनेचा आधार होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार, त्यांचे पुनर्वसन, आणि मानसिक आरोग्य सहाय्यही ट्रस्टच्या कामकाजाचा भाग असेल.
बीजे मेडिकल कॉलेजच्या पायाभूत सुविधांची पुनर्बाधणी
विमान कोसळले ते बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर. या घटनेत अनेक विद्यार्थी थोडक्यात बचावले, परंतु वसतिगृहाची मोठी हानी झाली. ट्रस्टच्या माध्यमातून या कॉलेजच्या पायाभूत सुविधांची पुनर्बाधणी करण्याचा मानस टाटा समूहाने व्यक्त केला आहे.
ट्रस्टचे संचालन: प्रतिष्ठित व्यक्तींच्या हाती
या ट्रस्टचं व्यवस्थापन ५ सदस्यीय विश्वस्त मंडळाद्वारे केलं जाणार आहे. यामध्ये टाटा समूहाचे माजी अधिकारी एस. पद्मनाभन आणि टाटा सन्सचे जनरल कौन्सिल सिद्धार्थ शर्मा यांची पहिल्या दोन विश्वस्तांमध्ये नियुक्ती झाली आहे. लवकरच आणखी तीन विश्वस्तांची नियुक्ती केली जाईल.
स्मृतीस्थळ उभारण्याचीही घोषणा
या अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांची आठवण म्हणून अहमदाबादमध्ये ‘AI-171 स्मारक’ उभारण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टच्या घोषणेमध्ये देण्यात आली आहे. हे स्मारक केवळ एका दुर्घटनेची आठवण ठेवणारे नव्हे, तर भविष्यातील नागरी उड्डाण सुरक्षिततेसाठी समाजाला जागृत करणारे केंद्र असेल, असे टाटा सन्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एका अपघातामागे असलेली माणुसकीची संवेदना
टाटा समूहाने घेतलेला हा निर्णय फक्त आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही. तो एका व्यावसायिक समूहाने सामाजिक बांधिलकी जपत केलेला सकारात्मक, दूरगामी विचार आहे. अपघाताने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबीयांसाठी ही मदत नवजीवनाची आशा देणारी ठरेल, असे मत विविध सामाजिक संस्थांकडून व्यक्त होत आहे. अशा दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर केवळ नुकसानभरपाई न देता, स्मृती जपणारा आणि पुन्हा नव्याने उभं राहण्याची संधी देणारा ट्रस्ट उभारून टाटा सन्सने भारतीय उद्योगसमूहांसाठी एक नवा मानदंड स्थापित केला आहे.