थोडक्यात
नक्षली म्होरक्या भूपतीसह 60 जणांचं आत्मसमर्पण
गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
नक्षली इतिहासातील सर्वात मोठी शरणागती
गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा कणा मोडण्यात मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठे यश आले आहे. कारण, बुधवारी (15 ऑक्टोबर) नक्षली इतिहासातील सर्वात मोठे आत्मसमर्पण झाले आहे. कारण, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपतीने त्याच्या तब्बल 50हुन अधिक सहकाऱ्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
6 कोटींचे बक्षीस माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर असलेल्या भूपतीवर होते. पोलिसांच्या माहितीनुसार, दुसऱ्या क्रमांकाचाभूपती हा नक्षलवादी संघटनेतील मोठा नेता होता. माओवादी संघटना 1970 च्या दशकात पीपल्स वॉर ग्रुपमध्ये प्रवेश करणारा भूपतीची कारकिर्द गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सुरू झाली. भूपती हा नक्षलवादी नेता मल्लोजुला कोटेश्वरराव उर्फ किशनचा छोटा भाऊ आहे. नक्षलवाद्यांच्या संघटनेतील बौद्धिक चेहरा म्हणून भूपती हा प्रसिद्ध होता. त्याने आतापर्यंत घडलेल्या अनेक हिंसक घटनांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. खासकरून नक्षलवाद्यांच्या संघटनेची स्थानिक पातळीपासून केंद्रीय समितीपर्यंत आखणी करण्यात त्याने मोठी भूमिका बजावली आहे.
भूपतीने अभय नावाने आतापर्यंत अनेकदा पत्रके जारी केली आहेत. भूपतीने काही दिवसांपूर्वीच युद्धबंदी आणि चर्चा करण्यासह शस्त्रे टाकण्यासंबंधी महत्त्वाची विधाने केली होती. त्यावर नक्षलवाद्यांच्या नेतृत्वाने मोठी टीका केली होती. यामुळेच पहिल्यांदा माओवाद्यांच्या संघटनेत फूट पडल्याचे स्पष्ट झाले होते. गडचिरोली पोलिसांकडून गेल्या अनेक दिवसांपासून भूपतीचे आत्मसमर्पण घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु होते. भूपती शरण येताच गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद जवळपास संपुष्टात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 20 वर्षांत 700 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
कोण आहे भूपती?
मल्लोजुला वेणुगोपाल हा भूपती किंवा सोनू या नावानेही ओळखला जातो. गेली 40 वर्षे नक्षलवादी संघटनेच्या विस्तारासाठी सक्रिय असलेला भूपती हा केंद्रीय समिती आणि पोलिट ब्युरो सदस्यही होता. त्याच्यावर विविध राज्यांमध्ये मिळून 10 कोटींपेक्षाही अधिकचे बक्षीस घोषित करण्यात आले आहे. त्याचे बीकॉमपर्यंतचे शिक्षण झाले असून नक्षलवादी चळवळीतला जहाल नेता अशी त्याची ओळख आहे. तो महाराष्ट्र–छत्तीसगड सीमावर्ती माड डिव्हिजनमध्ये सक्रिय होता. गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश अशा राज्यांची जबाबदारी त्याच्याकडे होती.