सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खचलेल्या जमिनीमुळे मोठे भगदाड पडले असून, या परिसराचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुतळ्याच्या शेजारील चबुतऱ्याच्या बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, आता या परिसरातील जमीन खचल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. तत्काळ पाहणीचे आदेश देण्यात आले असून, प्रशासनाला आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी सार्वजनिक ठिकाणीही पाहणी सुरू असून, परिसरातील नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, हा पुतळा आणि चबुतरा उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, इतक्या खर्चानंतरही चबुतरा आणि त्याच्या आसपासची जमीन खचत असेल. तर त्यामागे कुठेतरी कामात हलगर्जी किंवा आर्थिक अपप्रवृत्ती झाल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
गेटवे ऑफ इंडिया जवळील समुद्रात उभा असलेला शिवतीर्थावरचा पुतळा वर्षानुवर्षे तग धरून आहे. त्याच्या तुलनेत मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरील पुतळ्याच्या परिसरात अशा समस्या का उद्भवत आहेत, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. पुन्हा एकदा मालवणच्या पुतळ्याच्या कामावर तक्रारी येत असल्यामुळे संताप आहे.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडने या घटनेवर नाराजी दर्शवत संपूर्ण राजकोट किल्ल्याच्या पाहणीची मागणी सरकारकडे केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुन्हा पाहणी करावी. शिवाजी चबुतऱ्या शेजारील जमिन का खचली याची चौकशी करावी. सरकारनं जर या कामात हलगर्जीपणा केला, तर हे शिवद्रोही सरकार आहे, असं आम्ही समजू, असा इशाराही त्यानी दिला आहे.
हेही वाचा