ताज्या बातम्या

Banganga Maha Aarti : बाणगंगेच्या आरतीचा तिढा सुटला...त्रिपुरी पौर्णिमेला होणार भव्य आरती

मुंबईतील वाळकेश्वर येथील प्राचीन तीर्थक्षेत्र असलेल्या बाणगंगेवरील त्रिपुरी पौर्णिमेच्या महाआरती आणि धार्मिक कार्यक्रमाला अखेर परवानगी मिळाली आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • बाणगंगेच्या आरतीचा तिढा सुटला

  • त्रिपुरी पौर्णिमेला होणार भव्य आरती

  • एक भव्य सांस्कृतिक उत्सव

मुंबईतील वाळकेश्वर येथील प्राचीन तीर्थक्षेत्र असलेल्या बाणगंगेवरील त्रिपुरी पौर्णिमेच्या महाआरती आणि धार्मिक कार्यक्रमाला अखेर परवानगी मिळाली आहे. दक्षिण मुंबईतील वाहतूक नियंत्रणाचे कारण देत मुंबई पोलिसांनी या सोहळ्याला परवानगी नाकारल्यामुळे निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. हा तिढा राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या महत्त्वपूर्ण पुढाकाराने आणि यशस्वी चर्चेनंतर सुटला आहे.

बाणगंगेवर दरवर्षी मोठ्या उत्साहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी परवानगी नाकारल्याचे पत्र ट्रस्टला दिले होते. यामुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर मंत्री लोढा यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सारस्वत गौड ब्राह्मण (GSB) टेंपल ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत उपस्थित असलेले पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे आणि बाणगंगा ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त महाले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांसमोर मंत्री लोढा यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

मोठ्या संख्येने भाविक जमा

यावेळी लोढा यांनी स्पष्ट केले की, धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक जमा होत असले तरी, प्रशासनाने जनतेच्या धार्मिक भावनांचा आदर करणे आवश्यक आहे. त्यांनी पोलीस प्रशासनाला थेट कार्यक्रम पूर्णपणे थांबवण्याऐवजी, वाहतूक आणि गर्दी नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना आणि व्यवस्थापन करण्याची सूचना केली.

ट्रस्टने आश्वासन दिले की, मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडे सक्षम व्यवस्था आणि अनुभव आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या जीएसबी टेंपल ट्रस्टच्या पारंपरिक पूजेला राज्य सरकारच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने दिलेल्या परवानगीचा दाखलाही दिला.

एक भव्य सांस्कृतिक उत्सव

बाणगंगा येथील महाआरती हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी नसून, एक भव्य सांस्कृतिक उत्सव असतो. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी बाणगंगेच्या तलावाभोवती आणि पायऱ्यांवर हजारो दिवे (तेलगट) प्रज्वलित केले जातात. ही महाआरती वाराणसीच्या प्रसिद्ध गंगा आरतीच्या धर्तीवर केली जाते. यामुळे अनेक भाविक, जे प्रत्यक्ष गंगा आरतीला उपस्थित राहू शकत नाहीत, त्यांना मुंबईतच तो अनुभव मिळतो.

अखेर सर्व समस्यांवर समाधानकारक तोडगा निघाला आहे. बाणगंगेवर येत्या ७ नोव्हेंबर रोजी हा भव्य आणि ऐतिहासिक महाआरतीचा सोहळा पार पडेल. या निर्णयामुळे सारस्वत गौड ब्राह्मण ट्रस्ट आणि मुंबईतील भाविकांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे विशेष आभार मानले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा