यंदाचे हिवाळी अधिवेशन वाद, आरोप आणि प्रत्यारोपांनी गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक ज्वलंत मुद्द्यांवरून सभागृह तापण्याची तयारी विरोधकांकडून सुरू झाली आहे.
१. पार्थ पवार जमीन घोटाळा केंद्रबिंदू
पुण्यातील पार्थ पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहारावरून विरोधक आक्रमक असून महसूल विभागातील लाचलुचपत, काही अधिकाऱ्यांवरील कारवाई, तसेच या प्रकरणातील मूळ मालकिनीला झालेली अटक – या सर्वांवरून “पार्थ पवारांना अभय का?” असा प्रश्न विरोधक उपस्थित करणार आहेत.
२. नाशिक तपोवन वृक्षतोडीवरून नवीन संघर्ष
नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणावरून ठाकरे गट व भाजप यांच्यात वाद चिघळला आहे. हा मुद्दा सभागृहात तापण्याची शक्यता आहे.
३. शेतकरी संकट: तोकडी मदत आणि कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. सरकारने दिलेली मदत तोकडी असल्याचा आरोप करत अद्यापही किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळाली याचे हिशेब विरोधक मागणार आहेत. कर्जमाफीवरून ग्रामीण आमदार आक्रमक झाले आहेत.
४. मतदार यादी घोळ: सरकार आणि आयोगावर घेरा
महाविकास आघाडीने मतदार याद्यांतील गोंधळावरून राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला असून हा मुद्दा सभागृहात मोठ्या आवाजात मांडला जाणार आहे.
५. महिलांवरील अत्याचार आणि गौरी गर्जे प्रकरण
राज्यात वाढत्या महिला अत्याचारांच्या घटना आणि गौरी गर्जे प्रकरणामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांकडून उत्तरांची मागणी करणार आहेत.
६. मुंबईतील मराठी–अमराठी वाद पुन्हा पेटला
मीरा-भाईंदरमध्ये मराठी कुटुंबाला घर नाकारल्याच्या घटनेवरून राज्य सरकारची भूमिका काय, यावरून प्रश्न उपस्थित होणार आहेत.
७. महायुतीमधील नाराजी आणि निधी वाटप
महायुतीतल्या नाराजीपासून ते निधी वितरणातील असंतोषापर्यंत अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्ष अडचणीत येऊ शकतो.
एकूणच, विविध प्रलंबित मुद्दे, घोटाळे, शेतकरी प्रश्न आणि सामाजिक तणाव यांच्या पार्श्वभूमीवर यंदाचे हिवाळी अधिवेशन अत्यंत वादळी आणि तापलेले राहण्याची शक्यता आहे.