पश्चिम रेल्वे मार्गावर वसई ते नायगाव या दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम करत असताना 3 कर्मचार्यांचा लोकलचा धक्का बसून मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमाराची ही घटना आहे. लोकल आल्यानंतर गाडी कोणत्या रुळावर येईल असा त्यांचा गोंधळ झाला आणि त्यामध्ये गाडीची धडक लागून तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
मुख्य सिग्नलिंग निरीक्षक वासू मित्रा, इलेक्ट्रिकल सिग्नलिंग मेंटेनर सोमनाथ उत्तम लांबुत्रे, मदतनीस सचिन वानखडे अशी अपघातात ठार झालेल्या कर्मचाऱ्यांनी नावे आहेत. हे तिघेही मुंबई रेल्वे विभागातील सिग्नलिंग विभागात कार्यरत होते. या अपघाताची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत म्हणून 55 हजार रुपये रेल्वेकडून देण्यात आले आहेत. तर उर्वरीत रक्कम 15 दिवसात देण्यात येणार आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सचिन वानखेडे आणि सोमनाथ लंबुरे यांच्या कुटुंबियाना 40 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तर मुख्य सिग्नल निरीक्षक वासु मित्र यांच्या कुटुंबियांना 1 कोटी 24 लाख रुपयांची मदत रेल्वेकडून मिळणार आहे. दरम्यान, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.