Raj & Uddhav Thackeray Vijayi Melava : आज मुंबईच्या वरळी भागात दोन प्रमुख नेत्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे‘मराठी विजय दिन’ निमित्ताने एकत्रितपणे उपस्थिती लावली. या संयुक्त कार्यक्रमात दोघांनीही जोरदार भाषणं करत सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. शिंदेंच्या अलीकडील वक्तव्याचा संदर्भ घेत उद्धव म्हणाले, "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली. तोच दाढीवाला माणूस पूर्वी 'झुकेगा नहीं साला' म्हणायचा, पण आता म्हणतो 'उठेगाही नहीं साला'. काहीही झालं तरी हा माणूस उठणार नाही," अशी टीका करत त्यांनी शिंदेंवर उपरोधिक बाण सोडला. भाजपच्या कार्यपद्धतीवर बोलताना उद्धव म्हणाले की, "भाजपचं धोरण ‘फोडा आणि राज्य करा’ असं आहे. समाजांमध्ये फूट पाडून ते सत्तेचा खेळ खेळतात."
त्यांनी पुढे म्हटलं की, "भाजपाचे नेते कोणत्याही लग्नाला आले तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. जेवण करतील, भांडण लावतील आणि शक्य झालं तर नवरीलाही घेऊन जातील!" कार्यक्रमाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना प्रश्न विचारत सांगितलं, "आपण नेहमी दुसऱ्याच्या पालख्या वाहणारे राहणार का? की मायमराठीला प्रत्यक्ष पालखीत बसवणार?" असा साद घालत मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला.