Uddhav Thackeray PC : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, काही ठिकाणी झालेल्या गोंधळामुळे निवडणूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदानानंतर निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत शंका उपस्थित केल्यानंतर आता शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मतदान केंद्रांवरील व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली. बोटावर लावली जाणारी खूण सहज काढता येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी “इथे फक्त शाई नाही, तर लोकशाहीच पुसली जात आहे,” असे ठामपणे सांगितले. ईव्हीएम, मतदार याद्या आणि मतदान केंद्रांवरील पक्षीय साहित्य यावरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले.
निवडणुका अनेक वर्षांनी होत असताना व्यवस्थेत सुधारणा न दिसणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. माध्यमांमधून येणाऱ्या बातम्यांकडे लक्ष वेधत, प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही त्यांनी केला.
टपाली मतदान, स्ट्राँग रूम आणि मतमोजणीच्या प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. अधिकाऱ्यांना मोकळीक दिली जात असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगावर जबाबदारी टाकली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “सत्तेकडे कोणतंही कर्तृत्व उरलेलं नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
दुबार मतदार, बनावट नोंदी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लोकशाही धोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. शेवटी त्यांनी मतदारांना आवाहन करत, “लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करा आणि चुकीच्या हातात सत्ता जाऊ देऊ नका,” असे सांगितले.