देशभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. रेल्वे स्थानकांवर महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित ‘फेशियल रिकग्निशन सिस्टीम’ (Facial Recognition System) लवकरच अनेक प्रमुख रेल्वे स्थानकांवर कार्यान्वित केली जाणार आहे. या योजनेची माहिती केंद्र सरकारने थेट सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.
या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे मिळालेल्या प्रतिमांचे विश्लेषण करून संशयित किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची ओळख पटवली जाईल. चेहरा ओळखण्याच्या या प्रणालीला पोलिसांच्या डेटा बेसशी जोडले जाईल, ज्यामुळे कोणत्याही संशयिताचा मागोवा घेणे आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई करणे शक्य होईल.
भारतीय रेल्वेच्या गजबजलेल्या स्थानकांवर हे कॅमेरे बसवले जातील. हे तंत्रज्ञान विशेषतः लैंगिक अत्याचार व महिला प्रवाशांविरुद्ध होणाऱ्या अन्य गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल, असा सरकारचा विश्वास आहे.
या यंत्रणेची कार्यक्षमता अत्यंत जलद आहे — काही मिलिसेकंदांत ती लाखो चेहऱ्यांची तुलना करू शकते. दिल्लीत 2024 मध्ये, अशाच प्रणालीच्या मदतीने अनेक चोर, स्नेचिंग करणारे गुन्हेगार ओळखले गेले होते. या तंत्रज्ञानाची खासियत म्हणजे ते कमी प्रतीच्या आणि अस्पष्ट सीसीटीव्ही फुटेजमधूनसुद्धा चेहऱ्याची अचूक ओळख पटवू शकते. महिला सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, भविष्यात देशभरातील इतर सार्वजनिक ठिकाणीही हे तंत्रज्ञान लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.