राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत सत्तेवर आपला दावा मजबूत केला आहे. या निवडणुकीत भाजपला ८९ तर शिवसेना (शिंदे गट) ला २९ जागा मिळाल्या असून, महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे, ठाकरे बंधूंच्या युतीला अपेक्षित यश मिळाले नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ६५ जागा मिळाल्या असून, राज ठाकरे यांच्या मनसेला केवळ काही जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसला २४ जागा मिळाल्या असून, इतर व अपक्षांचा आकडा १२ इतका आहे.
या निकालामुळे तब्बल २५ वर्षांनंतर मुंबई महापालिकेतील सत्तेचा किल्ला ठाकरे यांच्या हातातून निसटला आहे. या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे यांनी युती केली होती. मात्र या युतीचा अपेक्षित प्रभाव मतदारांवर पडलेला दिसून आला नाही. महायुतीच्या विजयामुळे आता मुंबई महापालिकेत हिंदू मराठी महापौर विराजमान होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सर्वप्रथम मतदारांचे आभार मानले. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “भारतीय जनता पक्षाने कागदावर शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना संपवू शकत नाहीत. कालच्या मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर निवडणूक निकालांनी हे स्पष्ट केलं आहे.” भाजपवर गंभीर आरोप करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप जर खऱ्या अर्थाने जमिनीवर असता, तर त्यांना पक्ष फोडण्याची गरज पडली नसती. “त्यांना पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता आणि नियम बदलण्याची वेळ आली नसती,” असा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, या निवडणुकीत निवडून आलेले शिवसैनिक साधे, सामान्य आहेत. “प्रचंड पैशाच्या धबधब्यासमोर निष्ठा कशी लढते आणि कशी जिंकते, हे या शिवसैनिकांनी दाखवून दिलं आहे,” असे ते म्हणाले. तसेच त्यांनी स्पष्टपणे कबूल केले की, “मला मुंबईकरांकडून आणखी अपेक्षा नक्कीच होती.” २५ वर्षे केलेली सेवा, विकासकामे आणि कोविड काळात राबवलेल्या ‘मुंबई मॉडेल’ची जगभरात झालेली प्रशंसा पाहता अधिक आशीर्वाद मिळतील अशी अपेक्षा होती, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र, “मोठ्या प्रमाणावर नाही, पण जेवढे आशीर्वाद मिळाले ते भरपूर आहेत,” असे म्हणत त्यांनी मुंबईकरांचे आभार मानले.