असं म्हणतात प्रेम ही निर्मळ भावना आहे. ज्यांना ती भावना समजली त्यांच नाव आजही इतिहासात वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारे जगभर प्रसिद्ध आहे. प्रेम हे कोणावरही केलं जात. प्रेमाला कोणतीही जात-धर्म किंवा रंग-रुप नसतं. ते सहज एखाद्या व्यक्तीच्या सहवासाने त्या व्यक्तीवर केलं जात. मात्र आजही आपल्या आजूबाजूला प्रेमाचा स्विकार तितक्या सहजपणे केला जात नाही. समाज-परिवार, नातेवाईक मित्रपरिवार यांचा विचार करुन अनेक प्रेमीयुग्लांना वेगळ व्हाव लागलं आहे.
मात्र, पश्चिम बंगालच्या सुंदरबन भागात प्रेमाचं एक अनोखं उदाहरण पाहायला मिळालं आहे. समाजाच्या ठरावीक चौकटी, विरोध आणि परंपरांना मागे टाकत दोन युवतींनी मंदिरात एकमेकींना वरमाला घालून आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतली. ही धाडसी प्रेमकथा आहे रिया सरदार आणि राखी नस्कर या दोन युवतींची, ज्यांनी प्रेमासाठी समाजाच्या विरोधालाही न जुमानता आपला निर्णय घेतला.
रिया सरदार ही सुंदरबनच्या मंदरबाजारची तर राखी नस्कर ही बकुलतला गावची रहिवासी आहे. दोघीही व्यावसायिक नर्तिका असून, सुमारे दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात दोघींची ओळख झाली. ही ओळख हळूहळू मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलली. या प्रेमसंबंधाला दोन्ही कुटुंबांकडून एकसमान प्रतिसाद मिळाला नाही. राखीच्या कुटुंबीयांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला, मात्र रिया च्या कुटुंबाने सुरुवातीला विरोध केला. तरीही दोघींनी हार न मानता स्वतःच लग्न करण्याचा निर्णय घेतला.
शेजारी आणि काही मित्रांच्या मदतीने स्थानिक मंदिरात एक छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला. तेथे दोघींनी एकमेकींना वरमाला घातली. शिवमंदिरात झालेल्या या विवाह सोहळ्याला स्थानिक लोक उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने पूजा, आरती करून दोघींनी एकमेकींना वरमाला घातली. स्थानिक रहिवाशांनीही या निर्णयाचं स्वागत करत “प्रेम झुकत नाही” असं म्हणत दोघींना शुभेच्छा दिल्या. या विवाहाने समाजातील ठरावीक नियमांना खोडून काढत एक ठोस संदेश दिला आहे.