सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. लोकसभा सचिवालयातील काही सूत्रांनी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ल्याचा कट रचला जात असल्याचा दावा केला. या आरोपामुळे राजकीय वातावरण तापलं असून, याच कारणामुळे पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाषण टाळल्याचंही बोललं जात आहे.मात्र काँग्रेसने हे सर्व आरोप साफ नाकारले आहेत. या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना संसदेत मोकळेपणाने बोलू दिलं जातं. पण विरोधी पक्षनेते राहुल गांधी देशाच्या सुरक्षेवर किंवा चीनच्या घुसखोरीवर बोलू लागले की त्यांचा माईक बंद केला जातो. याच विरोधात आम्ही निषेध नोंदवला, असं त्यांनी स्पष्ट केलं.
त्या पुढे म्हणाल्या की, "आम्हाला संसदीय लोकशाही आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे. काँग्रेस पक्ष अहिंसेचा मार्ग मानतो. आम्ही संसदेत कोणताही गोंधळ घालायला गेलो नव्हतो, फक्त शांततेने एक बॅनर हातात घेतला होता."
बांगड्यांवरून झालेल्या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. "बांगड्या घालणं हा गुन्हा नाही, आणि एका बॅनरमुळे जर एवढी भीती वाटत असेल, तर तो प्रश्न सरकारला स्वतःला विचारायला हवा, असंही त्या म्हणाल्या."