हिंदीवरुन टीका करताना संदीप देशपांडेंची जीभ घसरली आहे. यावेळी सरकारमधील लोकांचा देशपांडेंकडून षंढ उल्लेख करण्यात आला आहे. 'सरकारमध्ये षंढ बसले असतील, तर मराठी माणसाने काय करावं?' विधान भवनातील फक्त हिंदी, इंग्रजी मजकुरावरुन तोफ सुरु आहे'. असं वक्तव्य यावेळी संदीप देशपांडे यांनी केलं आहे. यावर नीलम गोऱ्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
निलम गोऱ्हे म्हणाल्या की, "मराठी भाषा सक्ती करण्याचा कायदा देखील आम्ही विधीमंडळात केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटत की, जे लोक छोट्या गोष्टींवरून टीका करतात, ते जर विधानभवनात कधी निवडून आले तर त्यांना त्यांच म्हणण किती निर्थक आहे हे त्यांना समजेल".
दरम्यान, संदीप देशपांडे म्हणाले की, "सर्व षंढ लोक सरकारमध्ये बसले असतील तर मराठी माणसाने करायचं काय? त्यांना आधी पडलेली कानाखाली विसरले असतील तर पुन्हा एकदा आम्हाला कानाखाली द्यावी लागेल. त्याशिवाय त्यांची अक्कल ठिकाणावर येणार नाही. मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की सरकारला अजूनही हिंदी बद्दल का प्रेम आहे ? कळत नाही. मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिला आहे तुम्ही विसरून नये. ज्यांनी निवडून दिले तो तुम्हाला घरी पण बसवू शकतो हे लक्षात घ्यावे".
"कार्यक्रम जर महाराष्ट्रात होत आहे तर तिथे मराठी असायला पाहीजे. लोकलमध्ये तीन भाषा आहेत, एअरपोर्टवर तीन भाषेत लिहिले आहे मग इथे का नाही. माझा शब्द झोबंला असेल पण मी बोललो ते बोललो. लोकसभेने 22 भाषांना मंजुरी दिलेली आहे, ज्या राज्यात कार्यक्रम आहे तिथे त्या राज्याची भाषा नको का? मला यावरून जर हक्कभंगाच्या कार्यक्रमाला सामोरे जाव लागल तर जायला तयार आहे. आपली भाषा आपण जपली पाहीजे. ते काय बिहारचे लोक येऊन जपणार आहेत का? मी व्यक्ती बद्दल नाही प्रवृत्ती बद्दल बोललो आहे. त्यामुळे याबद्दल जर मला जेलमध्ये जावं लागणार असेल, तर मी तयार आहे".