सांगलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करायचे असेल तर जातीची अट घालण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. गेल्या काही दिवसापासून ई-पॉस मशिन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अशा पध्दतीचे अपडेटस् आले आहेत.
शेतीसाठी खत घ्यायचं असेल तरीही जात सांगणं बंधनकारक करण्यात आलंय.खत खरेदीसाठी ई-पॉसमध्ये जातीचा रकाना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. खत घेताना दुकानदारांकडून आपल्या जाती बद्दलची विचारणा होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत..रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना आपली जात सांगावी लागत असल्यामुळे बळीराजांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
खत विक्रेत्याला जात सांगितल्याशिवाय शेतकऱ्याला यापुढे खत मिळणार नाही. हे ऑप्शन सिलेक्ट केल्याशिवाय खरेदीची पूर्ण होणार नसल्याचे सांगितले जात आहे. शेतकर्यांना दुकानांत खत खरेदीसाठी गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर पॉस मशिनवर शेतकर्यांना अंगठा घेऊन खत दिले जाते. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी ई-पॉस मशिन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेटस् आले आहेत. त्यामुळे आता खतासाठी जात कशाला पाहिजे असा प्रश्न निर्माण झाला आहे.