दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. बारामती येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या अस्थी राज्यभर पाठवण्यात येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
या कठीण काळात पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारावी, अशी भावना सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. पवार कुटुंबाची तीन दिवस शोक पाळण्याची परंपरा असून, त्यानंतर चौथ्या दिवशी शपथविधी पार पडल्याचे स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिले.
श्रद्धांजली सभेत बोलताना प्रफुल्ल पटेल भावूक झाले. 1991 साली अजित पवार यांच्यासोबत राजकारणाची सुरुवात केल्याची आठवण त्यांनी सांगितली. अवघ्या काही दिवसांपूर्वी झालेली शेवटची भेट आजही मनात घर करून असल्याचे त्यांनी नमूद केले.
अजित पवारांनी आयुष्यभर संघर्ष करत नेतृत्व केलं. त्यांच्या विचारांप्रमाणेच पक्षाची वाटचाल सुरू राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रामाणिक काम, लोकांसाठी उभं राहणं आणि दिलेलं वचन पूर्ण करणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे पटेल म्हणाले.
थोडक्यात
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा
सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय वर्तुळात तीव्र दुःख व्यक्त
बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले
अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या अस्थी राज्यभर पाठवण्याची प्रक्रिया सुरू
विविध जिल्ह्यांत श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
अजित पवार यांच्या कार्याची व योगदानाची आठवण काढत शोक व्यक्त