राज्यात झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवत इतिहास घडवला असून, या विजयामुळे महाराष्ट्रातील नंबर एक पक्ष हा भाजपच असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “महायुतीचाच विजय होणार हे विरोधकांना आधीच कळून चुकले होते,” असा दावा करत त्यांनी या निकालाला जनतेचा कौल असल्याचं म्हटलं.
फडणवीस म्हणाले की, 2014 च्या निवडणुकीनंतर भाजपने केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही सातत्याने विश्वास मिळवला आहे. या निवडणुकांमधूनही तो विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. राज्यातील तब्बल 75 टक्के नगराध्यक्ष महायुतीचे निवडून आले असून, तीन हजारांहून अधिक नगरसेवक भाजपचे विजयी झाले आहेत, ही बाब अभिमानास्पद असल्याचं त्यांनी नमूद केलं.
“इतिहासात पहिल्यांदाच इतका मोठा विजय मिळाला आहे,” असं सांगत फडणवीस यांनी या यशाचं श्रेय सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मंत्र्यांना दिलं. “सगळ्या मंत्र्यांनी आपापली निवडणूक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. प्रत्येकाने मैदानात उतरून मेहनत घेतली, त्यामुळेच हे अभूतपूर्व यश मिळालं,” असं ते म्हणाले.
निवडणूक प्रचाराबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, “मी स्थानिक निवडणुकांमध्ये पूर्णपणे सकारात्मक प्रचार केला. कोणावरही टीका न करता, विकास आणि कामगिरीच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली,” असं सांगत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टोला लगावला.
महायुतीतील घटक पक्षांच्या समन्वयाबाबत बोलताना फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही विशेष अभिनंदन केलं. “महायुतीतील सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे यश मिळालं आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. “राज्याच्या जनतेनं भाजप आणि महायुतीला मोठ्या मतानं विजयी केलं आहे. या विश्वासासाठी मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो,” असं सांगत फडणवीस यांनी पुढील काळातही विकासाचाच अजेंडा राहील, असा विश्वास व्यक्त केला.