देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यूदरही वाढत आहे. देशात ११ ते १४ एप्रिलपर्यंत 'लसीकरण उत्सव' साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. यावरुन काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींना चांगलाच टोला लगावला आहे.
'एकदा सरकार म्हणतं की, लसीकरण मोहीम हा उत्सव आहे. दुसऱ्या दिवशी म्हणतात की, युद्ध आहे. नेमकं काय आहे? असा प्रश्न पी. चिदंबरम यांनी केला आहे. टि्वट करत चिदंबरम यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.
पंतप्रधानांनी पहिला लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा त्यांनी 21 दिवसांत युद्ध जिंकू, असा दावा केला होता. यावेळी त्यांनी महाभारतातील युद्धाशी तुलना केली होती जे 18 दिवसांत जिंकलं होतं. त्याचं काय झालं? असंदेखील चिदंबरम यांनी म्हणत निशाणा साधला.
'पोकळ अभिमान आणि अतिशयोक्ती आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यास मदत करणार नाही. सरकार लसींचा पुरवठा आणि वाटपामधील आपलं मोठं अपयश लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे' असा आरोपदेखील त्यांनी केला आहे.