केनिंग्टन ओव्हलवर पार पडलेल्या पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 6 धावांनी थरारक पराभव करत मालिका 2-2 अशा बरोबरीत संपवली. या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने एक महत्त्वाचं वक्तव्य करत विजयाचं श्रेय आपल्या वेगवान गोलंदाजांना दिलं आहे.
यावेळी कॅप्टन गिल म्हणाला की, "जेव्हा तुमच्याकडे मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे गोलंदाज असतात, तेव्हा कर्णधारपद निभावणं खूप सोपं होतं. भारताच्या विजयामध्ये या दोघांच्या निर्णायक माऱ्याचं मोठं योगदान होतं. विशेषतः सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला जिंकण्यासाठी फक्त 35 धावांची गरज असताना, भारतीय गोलंदाजांनी अफलातून खेळ करत इंग्लंडला 6 धावांनी पराभूत केलं".
गिलला विचारण्यात आलं की, या 6 आठवड्यांच्या मालिकेत तू काय शिकलास? त्यावर तो म्हणाला की, "Never Give Up कधीही हार मानू नये." त्याचं हे विधान टीम इंडियाच्या विजयाच्या निर्धाराचं प्रतीक ठरतं. कारण सामना भारताच्या हातातून निसटतोय असं वाटत असतानाही, संघाने शेवटपर्यंत झगडत सामना आपल्या बाजूने वळवला. गिलने संपूर्ण मालिकेत एकूण 754 धावा करत जबरदस्त कामगिरी केली आणि त्यामुळे त्याला 'प्लेअर ऑफ द सिरीज' म्हणून गौरवण्यात आलं. गिलने आपल्या फलंदाजीत सातत्य राखत संघाला अनेक संकटांतून बाहेर काढलं.
"दोन्ही संघांनी संपूर्ण मालिकेत अ-गेम दाखवत उत्कृष्ट क्रिकेट खेळलं," असल्याचं गिलने सांगितलं. पाचव्या कसोटीत इंग्लंडनेही झुंज दिली होती. हॅरी ब्रूक (111) आणि जो रूट (105) यांच्या शतकांमुळे इंग्लंडने सामना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांना अखेरच्या क्षणी रोखलं. पाचव्या दिवशी जेव्हा इंग्लंडला केवळ 35 धावांची गरज होती, आणि भारताला 4 विकेट्स हव्या होत्या, तेव्हा अनेकांनी भारताचा पराभव निश्चित मानला होता. मात्र प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्या धारदार माऱ्यामुळे भारताने सामन्याचा नाट्यमय शेवट करत 6 धावांनी विजय मिळवला.