भारतीय क्रिकेटमधील एक नाव जे मैदानावर फारसं झळकलं नाही, पण नेतृत्व, सातत्य आणि व्यवस्थापनात आपला ठसा उमठवत अखेर देशाच्या सर्वोच्च क्रिकेट संस्थेचं प्रमुखपद मिळवलं आहे. हो, आपण बोलतोय मिथुन मन्हास यांच्याबद्दल. रॉजर बिन्नी यांच्यानंतर BCCI अध्यक्षपदी त्यांच्या निवडीची घोषणा झाली आणि सोशल मीडियावर चर्चांचा पूर आला.
परंतु मन्हास चर्चेत येण्याचं कारण केवळ त्यांचा नवा दर्जा नव्हे. एका जुन्या फोटोने अचानक वाऱ्याची दिशा बदलली आहे. या फोटोत ते कोणी दुसरे नाही, तर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग यांची पत्नी आरतीसोबत दिसत आहेत. आणि त्यानंतर अफेअरच्या चर्चांना इंटरनेटवर उधाण आलं आहे.
सेहवाग-आरतीमध्ये दुरावा, आणि फोटोमुळे शंका गडद
सेहवाग आणि त्यांच्या पत्नी आरती अहलावत यांचं नातं गेल्या काही महिन्यांपासून वादात आहे, अशा चर्चा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरू होत्या. दोघंही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र फारसे दिसले नाहीत. त्यातच मन्हास आणि आरती यांचा एक जुना फोटो पुन्हा व्हायरल झाला. त्यामुळे सेहवाग-आरतीच्या नात्याचा अंत आणि मिथुन मन्हाससोबत अफेअरचा सूर सोशल मीडियावर चढू लागला. सध्या तरी या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, पण चर्चेला जोर मिळाला आहे, हे मात्र नाकारता येणार नाही.
मिथुन मन्हास यांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर फारसं लक्षवेधी नव्हतं. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी दिल्लीतून 157 प्रथम श्रेणी सामने खेळत तब्बल 9700 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यांचा रणजीतील अनुभव, संघाचे नेतृत्व, आणि प्रशिक्षणातील भूमिकांमुळेच त्यांचं नाव क्रिकेट प्रशासनात पुढे आलं. BCCI अध्यक्ष म्हणून त्यांच्या निवडीमागे काही राजकीय समर्थन आणि संघटनात्मक विश्वासही असावा, असं जाणकारांचे म्हणणे आहे.
मन्हास यांची एकूण संपत्ती 2025 पर्यंत अंदाजे 10 ते 12 कोटी रुपये इतकी असल्याचं बोललं जातं. देशांतर्गत क्रिकेटमधील मानधन, IPL करार, तसेच प्रशिक्षक आणि सल्लागार म्हणून त्यांनी कमावलेले पैसे, यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बळकट झाली आहे. ते चेन्नई सुपर किंग्ज, पुणे वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांसारख्या आयपीएल संघांसाठी खेळले होते. याशिवाय त्यांनी जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये काम केलं असून, BCCI च्या अनेक महत्त्वाच्या बैठकींमध्ये सहभाग घेतलेला आहे.
जम्मूचा खेळाडू, भारतीय क्रिकेटचा शिखर
12 ऑक्टोबर 1979 रोजी जन्मलेले मिथुन मन्हास हे BCCI अध्यक्षपदी निवडले गेलेले पहिले जम्मू काश्मीरमधील क्रिकेटपटू आहेत. त्यांची ही निवड राज्यासाठी ऐतिहासिक ठरली आहे. 20 वर्षांच्या क्रिकेट प्रवासात त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. त्यांचा नेतृत्वगुण आणि मैदानाबाहेरचा दृष्टिकोन यामुळेच आज ते देशातील सर्वात मोठ्या क्रीडा संस्थेचे अध्यक्ष झाले आहेत.