आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची फायनल आज दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू झाला असून न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला किवी संघाकडून षटकार आणि चौकारासह जोरदार फलंदाजी पाहायला मिळाली. अस असताना टीम इंडियाचे गोलंदाज त्यांच्या भेदक गोलंदाजीसह किवी टीमवर भारी पडले आहेत. न्यूझीलंडने 7 गडी गमावत भारताला 252 धावांचे आव्हान दिले आहे.
टीम इंडियाकडून ओपनींगसाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात केली. यानंतर रोहित शर्माने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 41 बॉलमध्ये 5 चौकार, 3 षटकारांसह झंझावाती अर्धशतक झळकावले. यावेळी त्याला गिलची चांगली भागिदारी मिळाली. यानंतर टीम इंडियाने 11 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता रोहित शर्मा आणि गिलच्या भागीदारीने १०० धावांचा टप्पा गाठला. यानंतर शुभमन गिल हा सँटनरच्या 19 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर झेलबाद झाला. गिलने 50 बॉलमध्ये एका षटकारासह 31 धावा केल्या आणि बाद झाला.
त्यानंतर कोहली मैदानात येताच चाहत्यांच्या अपेक्षा वाढू लागल्या मात्र, मायकेल ब्रेसवेलच्या 20 ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विराट कोहली पायचीत झाला. ज्यामुळे भारताला लागोपाठ दोन धक्के बसले आहे आणि भारताने 20 ओव्हरमध्ये 2 विकट गमावत 108 धावा केल्या आहेत. यानंतर रोहितला श्रेयस अय्यरची भागिदारी मिळाली. रोहित शर्मा शतक करेल असं चाहत्यांना वाटू लागताच भारतीय संघाला मोठा धक्का बसला.
27 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर रोहित शर्मा स्टंपिंग झाला आणि रोहित मोठा फटका खेळण्यासाठी पुढे गेला ज्यामुळे बॉल थेट लॅथमच्या हातात गेला. रोहित शर्मा 83 बॉलवर 7 चौकार आणि 3 षटकार मारत 76 धावांसह बाद झाला. रोहित शर्माने भारतीय संघाचा कर्णधार म्हणून वनडेमध्ये 2500 धावांचा पल्ला गाठला आहे. टीम इंडियाने गेल्या 17 धावांमध्ये 3 महत्त्वाच्या विकेट गमावल्या. टीम इंडियाला आता विजयासाठी 138 बॉलमध्ये 130 धावांची गरज आहे.