(IPL 2025) आयपीएल 2025ही स्पर्धा एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, या आयपीएलच्या सामन्यांमध्ये हवामानाने अडथळा आणायला सुरुवात केली आहे. आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला, तर इतर तीन सामन्यांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
यंदा लीग टप्प्यात फक्त 9 सामने खेळवले जाणार असून प्रत्येक सामन्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. अशा स्थितीत हवामानामुळे सामने रद्द होणे टाळण्यासाठी आणि अधिकाधिक खेळ होण्यासाठी बीसीसीआयने अतिरिक्त प्रतीक्षा वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 20 मेपासून होणाऱ्या उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआयने प्रतीक्षा वेळ 60 मिनिटांवरून थेट 120मिनिटांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही सवलत फक्त प्लेऑफ सामन्यांपुरती मर्यादित होती. आता सर्व सामन्यांसाठी लागू केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
नियमांमध्ये बदल करण्यात आले असून नियमानुसार, जर सामना पावसामुळे उशिरा सुरू झाला, तर रात्रीच्या सामन्यांचा कटऑफ वेळ 10:30 ऐवजी 11:30 वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच, दुपारच्या सामन्यांसाठी हा कटऑफ वेळ संध्याकाळी 6:50 ऐवजी 7:56 असा असेल.
बीसीसीआयने याबाबत अधिकृत निवेदन जारी करत सांगितले की, उर्वरित लीग सामन्यांमध्ये सामना पूर्ण होण्यासाठी अतिरिक्त वेळ देणे आवश्यक आहे, जेणेकरून स्पर्धा रोमांचक पद्धतीने पार पडू शकेल.