भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) आशिया कप 2025 साठी जाहीर केलेल्या संघातून श्रेयस अय्यरला वगळण्यात आलं आहे. मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर आणि टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मंगळवारी संघाची घोषणा केली. अय्यरला 15 जणांच्या मुख्य संघात किंवा पाच राखीव खेळाडूंमध्येही स्थान देण्यात आलं नाही.
अय्यरने अलीकडेच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत उत्कृष्ट खेळ केला होता. तसेच आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करत त्याने संघाला अंतिम फेरी गाठून दिली. 17 सामन्यांत त्याने 604 धावा केल्या आणि 175 चा स्ट्राइक रेट राखला. या कामगिरीनंतरही त्याला स्थान न मिळाल्याने चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
भारताचा माजी सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, "20 जणांच्या टीममध्ये सुद्धा अय्यरला स्थान न देणं हे आश्चर्यकारक आहे. याचा अर्थ निवड समिती त्याला सध्याच्या सामन्यात निवडत नाही. अनेकदा निवड प्रक्रियेत हा प्रश्न येतो की, कोणता खेळाडू अधिक पसंत आहे. कदाचित अय्यरला तेवढं प्राधान्य दिलं गेलं नाही."
मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर यांनी स्पष्ट केलं की, "अय्यरची चूक नसली तरी मर्यादित जागेमुळे त्याला थांबावं लागेल. त्यांनी पुढे सांगितलं की, "आम्ही फक्त 15 जणांचा संघ निवडू शकतो. यशस्वी जायसवाल आणि अभिषेक शर्मा यांच्यातही स्पर्धा होती. अभिषेककडे फलंदाजीसोबत गोलंदाजीचाही पर्याय असल्यामुळे त्याला संघात घेतलं. दुर्दैवाने यशस्वी आणि अय्यरला प्रतीक्षा करावी लागेल." या निर्णयामुळे निवड प्रक्रियेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अय्यरच्या पुढील संधीची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये वाढली आहे.
त्याचसोबत श्रेयस अय्यरच्या चाहत्यांनी बीसीसीआयवर आणि निवड प्रक्रियेवर टीका करत कमेंटमध्ये म्हटलं आहे की, "माझी समस्या इथे आहे... स्टँडबाय लिस्टमध्ये श्रेयस अय्यरही नाही.. तुम्ही अशा व्यक्तीला योग्य संदेश देत नाही आहात ज्याच्याकडे भारताचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे . श्रेयस अय्यर आशिया कपमध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहे. सरपंच साहेब नाही तर आशिया कप नाही... बीसीसीआयने यशस्वीरित्या त्याचे सर्वोत्तम आयुष्य वाया घालवले. श्रेयस अय्यरवर बीबीसीआयचा कट, म्हणूनच त्याची निवड झाली नाही...."