24 ऑक्टोबरला झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० मॅचमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा पराभव झाला. परिणामी संतापलेल्या काही विद्यार्थ्यांनी पंजाबच्या महाविद्यालयात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या काही काश्मिरी विद्यार्थ्यांवर आपला राग काढला. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली तसंच हॉस्टेलच्या रुममध्ये तोडफोडही करण्यात आली. मूळच्या उत्तर प्रदेश आणि बिहारच्या विद्यार्थ्यांवर मारहाणीचा आरोप करण्यात येतोय.
ही घटना पंजाबच्या संगरुरमध्ये 'भाई गुरु दास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी' महाविद्यालयाच्या हॉस्टेल इमारतीत घडली. इथे अनेक काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप होतोय.
काश्मिरी विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या मारहाणीचं फेसबुक व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारणही करण्यात आलं. आपल्यावर रॉड आणि काठ्यांनी हल्ला करण्यात आल्याचा आरोप या व्हिडिओत काश्मिरी विद्यार्थ्यांनी केला. मारहाण करणारे विद्यार्थी काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला करताना त्यांनी 'पाकिस्तानी' म्हणवून हिणवत होते.
'आम्ही इथे मॅच पाहत असताना यूपी वाले आमच्यावर तुटून पडले. आम्ही इथे शिक्षण घेण्यासाठी आलो आहोत आणि आम्हीही भारतीय आहोत. तुम्हीही पाहू शकता आम्हाला काय वागणूक देण्यात येतेय. आम्ही भारतीय नाहीत का? मोदीजी यावर काय बोलणार?' असा प्रश्न या काश्मिरी विद्यार्थ्यांनी विचारलाय.