भारत आणि श्रीलंका संघांत तिसरा टी-२० सामना राजकोट येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेला आता विजयासाठी २२९ धावांची गरज आहे. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्याचे हे टी-२० क्रिकेटमधील तिसरे शतक आहे. सूर्यकुमार यादवने ४५ चेंडूत शतक पूर्ण केले. त्यामुळे भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत २२८ धावा केल्या.
सूर्यकुमार यादवने श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. तर शुभमन गिलनेसुद्धा फटकेबाजी केली. शुभमन गिल ३६ चेंडूत ४६ धावा काढून बाद झाला. त्याने सूर्यकुमार यादवसोबत १११ धावांची भागिदारी केली. शुभमन गिलनंतर हार्दिक पांड्या आणि दीपक हुड्डा हे दोघेही प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत तुफानी ११२ धावांची खेळी केली. या खेळीत सूर्यकुमार यादवने ७ चौकार अन् ९ षटकारांची आतषबाजी केली. तर अक्षर पटेलने ९ चेंडूत ४ चौकारांसह २१ धावा केल्या. यामुळे भारताने २० षटकात ५ बाद २२८ धावा केल्या.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अद्याप कोणतीच टी२० मालिका गमावलेली नाही. त्यामुळे पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सलग तिसऱ्या मालिका विजयासाठी उत्सुक आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही. त्यामुळे मालिका वाचवण्याचे आव्हानही भारतीय संघासमोर असणार आहे.
श्रीलंका संघ: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजय डी सिल्वा, चरित अस्लांका, अविष्का फर्नांडो, दासुन शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महिष तिक्ष्ण, कसून राजिता, दिलशान मधुशंका.
भारतीय संघ; इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.