(Saina Nehwal - Parupalli Kashyap )भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सायनाने नुकतीच सोशल मीडिया एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली असून, दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
सायना आणि कश्यप यांची ओळख त्यांच्या बॅडमिंटन कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनची. दोघांचंही प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हैदराबादमधील पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत झालं. प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांची मैत्री झाली आणि हळूहळू ही मैत्रीचे प्रेमात रुपांतर झालं. सुमारे दहा वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी 14 डिसेंबर 2018 रोजी विवाह केला.
सायनाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “कधी कधी जीवन आपल्याला अशा वाटेवर नेतं जिथे निर्णय घेणं कठीण असतं. अनेक विचारांनंतर मी आणि कश्यपने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघंही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, यश आणि स्थैर्य शोधत आहोत. या प्रवासात मिळालेल्या सुंदर आठवणींसाठी मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते.”
सात वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर आलेल्या या निर्णयानंतर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे सायनाच्या इन्स्टाग्रामवर आता कश्यपसोबतचा एकही फोटो दिसत नाही, तर दुसरीकडे कश्यपच्या प्रोफाईलवर मात्र अजूनही सायनासोबतचे फोटो आणि व्हिडीओ दिसत आहेत.