भारतात लवकरच मोबाईल रिचार्ज दर वाढू शकतात, अशी चर्चा रंगत आहे. Jio, Airtel आणि Vi डिसेंबरअखेर किंवा नववर्षाच्या सुरुवातीला प्लॅन १०-१२% महाग करण्याची शक्यता व्यक्त होते. अधिकृत घोषणा नसली तरी पेमेंट अॅप्सवरील अलर्टमुळे यूजर्समध्ये चिंता वाढली आहे.
भारतात डिसेंबर 2025 पासून मोबाइल रिचार्ज महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया त्यांच्या प्लॅनच्या किमती 10–12% वाढवू शकतात, असा अंदाज आहे. मात्र, या वाढीबाबत तिन्ही कंपन्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही.
ट्विटरवर @yabhishekhd यांनी X वर दावा केला की पेमेंट अॅप्स यूजर्सना १ डिसेंबरपासून रिचार्ज महाग होणार असल्याच्या सूचना दाखवत आहेत. “आता जुन्या दराने रिचार्ज करा” असे अलर्ट मिळत असल्याने अनेकांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली आणि रिचार्ज दर खरोखर वाढणार का, असा प्रश्न उपस्थित केला.
फायनान्स आणि पेमेंट अॅप्स रिचार्ज दर लवकरच वाढू शकतात, असे सूचित करणारे अलर्ट दाखवत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत. महागाई टाळण्यासाठी तत्काळ रिचार्ज करण्याचा सल्ला दिल्याने यूजर्सची चिंता वाढली आहे. अधिकृत घोषणा नसताना हे अलर्ट का येत आहेत, असा सवालही उपस्थित होत आहे.
अहवालांनुसार, टेलिकॉम प्लॅनमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. 199 रुपयांचा मासिक प्लॅन सुमारे 222 रुपये, तर 899 रुपयांची दीर्घकालीन योजना जवळपास 1006 रुपये होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिओ आणि एअरटेलने काही स्वस्त आणि 1GB/दिवस प्लॅन हटवून वाढीचे संकेत आधीच दिले आहेत. वाढत्या खर्चाची पूर्तता आणि 5G विस्तारासाठी निधी उभारण्याची गरज असल्याने व्हीआयही असेच पाऊल उचलू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
एअरटेलने कोणतीही घोषणा न करता आपल्या दोन लोकप्रिय प्रीपेड योजना—₹121 आणि ₹181—बंद केल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. कमी किमतीत चांगले फायदे आणि 30 दिवसांची वैधता देणारे हे प्लॅन अचानक हटवल्याने यूजर्सना पर्याय कमी पडले आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय आगामी टॅरिफ वाढीचा संकेत ठरू शकतो.