कल्याणमधील लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणात अतिशय धक्कादायक खुलासा समोर आला आहे. नराधम विशाल गवळीकडे मानसिक रुग्ण असल्याचा दाखला असल्याचं कळतंय. या दाखलाच्या आधारे त्याने दोन वेळा जामीन घेतल्याची माहिती समोर आली आहे. दाखला कोणी दिला आणि कसा मिळवला ? याबाबतचा तपास सुरू आहे.
कल्याण अत्याचार प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा काढला. अत्याचार करणाऱ्या आरोपीवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून फडणवीसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मनोरुग्णाबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनोरुग्णाचा दाखला देणाऱ्या डॉकटरांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कल्याणमध्ये काय घडलं होतं?
कल्याण प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. कल्याणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. दोन नराधमांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून तिची निर्घृण हत्या केली. कल्याणच्या बापगाव परिसरात ही धक्कादायक घटना घडली. ही चिमुकली दुकानातून खाऊ आणण्यासाठी पैसे घेऊन बाहेर गेली होती, परंतु ती घरी परत आलीच नाही. आठ ते नऊ तासांनी तिच्या कुटुंबाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.