Punjab Politics : नवज्योत कौर सिद्धू यांच्या ‘500 कोटी’ विधानावरून पंजाबमध्ये मोठी चर्चा; AAP आणि भाजपची काँग्रेसवर टीका
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
काँग्रेस नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी केलेल्या एका विधानामुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांनी सांगितले की काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केल्याशिवाय त्या सक्रिय राहणार नाहीत, तसेच मुख्यमंत्री होण्यासाठी 500 कोटी रुपये लागतात असा संकेत दिला. या वक्तव्यावर सत्ताधारी AAP आणि भाजपने जोरदार टीका केली आहे.
AAPची प्रतिक्रिया
AAPचे सरचिटणीस बलतेज पन्नू म्हणाले की, नवज्योत कौर यांनी दोन महत्त्वाचे दावे केले आहेत,
1. काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करावे.
2. सिद्धूंकडे 500 कोटी रुपये नाहीत.
पन्नू यांनी प्रश्न उपस्थित केला की, “जर 500 कोटी रुपये लागतात, तर हा पैसा कोणाकडे आहे? आणि तो कुठे जातो? पंजाबमधील लोकांना याची माहिती मिळायला हवी.”
भाजपची टीका
भाजपचे पंजाब अध्यक्ष सुनील जाखड यांनी म्हटले की, “काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी मोठ्या रकमेची गरज असते. पूर्वी 350 कोटींची चर्चा होती, आता 500 कोटींपर्यंत पोहोचल्याचे दिसते.” भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ म्हणाले, “नवजोत कौरांनी स्वतःच सांगितले की त्यांच्याकडे 500 कोटी नाहीत. यावरून काँग्रेसमध्ये पैशांच्या जोरावरच राजकारण चालत असल्याचे स्पष्ट होते.”
नंतर नवज्योत कौर सिद्धू यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पंजाबमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वावर नवे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नवज्योत कौर सिद्धूंनी मुख्यमंत्री होण्यासाठी ‘५०० कोटी लागतात’ असा उल्लेख केला.
AAP आणि भाजपनं काँग्रेसवर मोठे आरोप करत टीका केली.
सिद्धूंनी स्पष्टीकरण दिलं की, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला.
काँग्रेसच्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
