सोसायट्यांचे मेंटेनन्स थकल्यास मालमत्तेचा लिलाव होणार
मी अमुक अमुक नेत्यांचा माणूस आहे किंवा अधिकाऱ्याचा माणूस आहे, त्यामुळे मी सोसायटीचे मेंटेनन्स भरणार नाही अशा भ्रमात असणाऱ्यांनो आता सावधान !, कारण आता थकबाकी वसुलीसाठी तुमच्या मालमत्तेचाही लिलाव होऊ शकतो. या संदर्भातील घटना नुकतीच ठाण्यातून समोर आली आहे.
ठाणे शहरातील रामचंद्र नगरमधील प्रेमलता आणि दिलीपकुमार मोदी या दोघांच्या मालकीच्या असलेल्या सदनिकेच मेंटेनन्स २००५ पासून थकवला होता. २००९ पर्यंत हा आकडा ५ लाखांवर पोहचल्यावर सोसायटीच्या तक्रारीवरून उपनिबंधकांनी वसुली दाखला दिल्यानंतर नोटीस बजाऊन सर्वप्रथम सदनिकेवर कागदोपत्री जप्तीची कारवाई केली. तरीही कोणतीच दाद न मिळाल्याने त्यांच्या सदानिकेचा लिलाव करण्यात आला. ठाण्यातील मोदी कुटुंबाने थकवलेल्या पाच लाखांच्या मेंटेनन्स वसुलीसाठी सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून ठाणे हाऊसिंग फेडरेशनच्या वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करून सोसायटीची थकबाकी वसूल करून दिली आहे.
वर्षानुवर्षे सोसायटीचा मेंटेनन्स थकवला तरी कुणी आपले काही करू शकणार नाही, अशा भ्रमात जर कुणी असेल, तर त्यांच्या भ्रमाचा भोपळा केव्हाही फुटु शकतो. रहिवाशांना सोयीसुविधा देण्यासाठी इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रत्येक गृहनिर्माण संस्था दर महिन्याला ठराविक शुल्क आकारत असते. मेंटेनन्स ठराविक मुदतीत संबंधित गृहनिर्माण सोसायटीमध्ये भरणे बंधनकारक असते. मात्र प्रामाणिकपणे मेंटेनन्स भरणाऱ्यांसोबतच तो ‘थकवणारे’ सभासदही काही अपवाद वगळ्यास प्रत्येक सोसायट्यांमध्ये असतातच. त्यांच्याकडून ही थकबाकी वसूल करणे म्हणजे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या थकबाकीदार सभासदांकडील थकबाकी वेगवेगळे प्रयत्न करूनही मिळत नसेल, तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अंतर्गत कारवाई करता येऊ शकते. अश्याप्रकारे सुमारे १० सदनिकांवर आठवडाभरात कारवाई करण्यात आली असल्याची माहिती हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी दिली. इतकेच नव्हे तर जिल्ह्यात अशा थकबकीदारांची संख्या मोठी असून उपनिबंधकांकडून वसुली कारवाईसाठी आतापर्यंत सुमारे ४०० जणांची यादी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांमधील हे थकबाकीदार आहेत. या कारवायांमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.