Aditya Thackeray : दोन महिने त्रास सहन करा, हे चाळीस गद्दार बाद होणारच...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आपण या महाराष्ट्राला सुर्वण वैभवी काळाकडे घेवून जात होतो. कृषी, उद्योग या राज्याच्या डबल इंजिनच्या सहाय्याने आपण शेतकरी, तरुणांना सुखी करण्याचे प्रयत्न करत होतो. पण हे काही लोकांना खूपत होतं. म्हणून त्यांनी आपल्यातील चाळीस जणांना गद्दारी करायला लावली. त्या गद्दारांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत चाळीस वार केले आणि आपले सरकार पाडले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, दोन महिने त्रास सहन करा, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर हे सगळे गद्दार बाद झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिला. आमचा संविधान, देशाचा कायदा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. नक्कीच आपल्याला न्या मिळणार आणि हे घटनाबाह्य सरकार कोसळणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
एकीकडे घाम गाळणारा शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित आहे तर दुसरीकडे राज्यात एकमेव शेतकरी ज्यांच्या शेतात २ हेलिपॅड उतरतात ते म्हणजे मंत्रालायत बसणारे मुख्यमंत्री, असा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला आहे. ज्या सुरत या गद्दारांना लपून बसले होते त्या सुरत व गुजरात सरकारच आभार मानायला यांनी येथील उद्योगधंदे पळवले, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.
युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगने हिरावली आहे. खोके गँग ही महाराष्ट्रद्वेषी आहे, टक्केवारीत अडकली आहे, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
दरम्यान, राठवाड्याच्या पैठण विधानसभा मतदारसंघातील बिडकीनमध्ये शिवसंवाद यात्रेच्या सातव्या टप्प्यात शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी आज सभा घेतली.