'शिवसेनेचे आमदार 50 खोक्यासाठी गेले, राष्ट्रवादीचे नेते कशासाठी गेले?' देशमुखांनी सांगितले कारण?
आज जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा पार पडत आहे. या कार्यक्रमात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सोबतच आपल्या पक्षातील वरिष्ठ सहकारी हे ईडी आणि सीबीआयच्या भीतीने भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले, असल्याचं ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले अनिल देशमुख?
“शिवसेनेचे आमदार ते कशामुळे फुटले, त्यांना कशाचं आमिष दाखवलं, काय दिलं? 50 खोके एकदम ओके. 50 खोके घेऊन हे आमदार भाजप सरकारमध्ये सामील झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपच्या लक्षात आलं की हे आमदार सामील झाले तरी आपल्याला जसा फायदा व्हायला पाहिजे तसा फायदा न होता, याउलट तोटा झाला, हे जेव्हा भाजपच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी दुसरा प्रयोग केला”, असा दावा अनिल देशमुख यांनी केला यावेळी केला आहे.
शिवसेनेचे आमदार 50 खोक्यांच्या आमिषामध्ये गेले. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कशासाठी त्यांच्यासोबत गेले? तर हे सर्व ईडीच्या धाकाने तिकडे गेले”, अशी टीका अनिल देशमुख यांनी केली.
ईडीचा धाक तर त्यांनी मलाही दाखवला होता. आमच्यासोबत या, असं म्हणाले. पण मी त्यांना सांगितलं की, मी तुमच्यासोबत आयुष्यात कधी समझौता करणार नाही. त्यामुळे माझ्यावर मुंबईच्या पोलीस आयुक्ताला सांगून 100 कोटींचा आरोप करायला लावला”, असं अनिल देशमुख म्हणाले. मला दीड वर्ष जेलमध्ये ठेवलं”, असा आरोप अनिल देशमुखांनी केला.
“माझ्या सहा वर्षाच्या नातीची सुद्धा चौकशी केली. माझ्या नातीला कॅडबेरीचं आमिष दाखवून अर्धा तास चौकशी केली. माझ्यावर 130 धाडी टाकल्या. पण घाबरलो नाही. मी सांगितलं, मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि शेवटपर्यंत शरद पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. अशाप्रकारे आपल्या इतर साथीदारांसारखं मी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही”, असा टोला अनिल देशमुख यांनी लगावला.