महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीवर अनिल परबांची प्रतिक्रिया; म्हणाले...
सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झालेला आहे. या प्रकरणावरील निकाल कोर्टाने राखून ठेवला आहे. 7 जणांच्या घटनापीठाकडे निर्णय जाणार का? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सुनावणी नबाम रेबिया प्रकरणानुसार होणार का? याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटातील नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अनिल परब?
नबाम रेबिया प्रकरण सात जणांच्या घटनापीठाकडे जाईल असे आम्हाला वाटते. याचं कारण म्हणजे नबाम रेबिया केसमध्ये जे मुद्दे नव्हेत ते मुद्दे या खटल्यात उपस्थित झालेले आहेत. नबाम रेबिया खटल्यावर पाच न्यायाधीशांनी निर्णय दिला होता. आता बदललेल्या परिस्थितीतही पाच न्यायाधीशच निर्णय देणार असतील तर भविष्यात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हा खटला सात सदस्यीय घटनापीठाकडे सोपवावा अशी मागणी आमच्या पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. असे अनिल परब म्हणाले.
पुढे ते म्हणाले, न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला. या खटल्यावरील सुनावणीदरम्यान आठ मुद्दे विचारात घेण्यात आले. या आठ मुद्द्यांपैकी एका मुद्यावरील निकाल सात सदस्यीय घटनापीठ घेईल असे वाटत आहे. त्यानंतर सर्व आठ मुद्द्यांवर चर्चा होईल, असे वाटत आहे. कारण बरेचसे मुद्दे एकमेकांत गुंतलेले आहेत. त्यामुळे जेव्हा एका मुद्द्यावर जेव्हा निर्णय होईल, तेव्हा अन्य मुद्द्यांवरील निर्णय आपोआपच होईल, असे अनिल परब यांनी सांगितले.
आमच्या वकिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने युक्तिवाद केला. सध्या १० व्या अनुसूचिचे रक्षण करणे लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे. म्हणूनच न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. अन्यथा भारतीय लोकशाही पूर्णपणे पायदळी तुडवली जाईल. विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्षांचे अधिकार यावर जे आक्षेप घेण्यात आले होते, या सर्व आक्षेपांवर सविस्तर चर्चा झाली आहे. हे सर्व आक्षेप खोडून काढण्यात आलेले आहेत,असेही परब यांनी सांगितले.