बिहारच्या वैशालीमध्ये भरधाव ट्रकचा कहर; 15 जणांचा मृत्यू
बिहारच्या हाजीपूर जिल्ह्यातील देसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुलतानपूर गावात रविवारी रात्री भीषण अपघात झालाय. या अपघातात 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत. एका भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं हा अपघात झालाय. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केलाय. अपघातग्रस्तांना केंद्र सरकार आणि बिहार सरकारने मदत जाहीर केलीय.
बिहारची राजधानी पाटणापासून तब्बल 30 किलोमीटर अंतरावर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रस्त्याला लागूनच असलेल्या गावातील काही लोक स्थानिक देवता 'भूमिया बाबा'ची पूजा करण्यासाठी रस्त्याच्या कडेलाच असलेल्या पिंपळाच्या बाजूला एकत्र जमले होते. त्याचवेळी भीषण अपघात झाला. भरधाव येणाऱ्या ट्रकनं पूजेसाठी एकत्र जमलेल्या लोकांना धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आमदार मुकेश रोशन यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक मनीष कुमार म्हणाले, गावकरी लग्नाशी संबंधित प्रथेनुसार मिरवणूक काढण्यासाठी एकत्र जमले होते. जवळच्या सुलतानपूर गावात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी लग्न होतं. महनर-हाजीपूर महामार्गालगत भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे अपघात झाला.