आरेत एकही झाड कापणार नाही, कांजूरचा आग्रह केवळ इगोसाठी : फडणवीस
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरे सरकारले धक्क्यांवर धक्के बसत आहे. त्यामुळे राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे. उद्धव ठाकरे यांनी मूळात आरेमध्ये एकही झाड कापायचे नसताना कांजूरचा आग्रह धरण्याचं कारणच नव्हतं. आरेतील काम बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे. असं असतानाही केवळ इगोसाठीच कांजूरचा आग्रह धरण्यात आला होता. अशी जोरदार टिका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
फडणवीस नागपूरमध्ये बोलत असताना त्यांनी ही टिका केली आहे. मेट्रो कार शेड करिता आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कार शेडचे 29 टक्के काम पूर्ण झालं आहे. तर एकूण प्रकल्पाचा 85 टक्के काम पूर्ण झालंय. त्यामुळे चार वर्ष प्रकल्प थांबवून पंधरा-वीस हजार कोटी रुपयांनी किंमत वाढवणे योग्य नाही. हे पैसे जनतेच्या खिशातील पैसे आहेत आणि हे अशा पद्धतीने आम्ही वाया जाऊ देणार नाही. असे ते म्हणाले.
यासोबतच त्यांनी सांगितले की, कांजूर मार्गची जागा मेट्रो सिक्ससाठी मागितली आहे. कांजूरमार्गची जागा मेट्रो थ्रीसाठी योग्य नाही हे आमच्या काळातल्या कमिटीने तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसीएस सौनिक यांच्या हाय लेवल कमिटीनेही अहवालात स्पष्ट केलं आहे. कार शेड आरेमध्येच योग्य आहे. ते कांजूरमार्गमध्ये नेलं तर प्रचंड खर्च वाढेल आणि चार वर्षाचा उशीर होईल. असं फडणवीस म्हणाले.