नाशिकमध्ये काहींनी ब्लु प्रिंट आणली, त्यानंतर...; आदित्य ठाकरेंचा निशाणा, गाजराचं राजकारण
नाशिक : शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर प्रथमच आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिंदे गटावर टीकेची तोफ डागली. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला आहे. नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वी काहींनी ब्लु प्रिंट आणली त्याचं काय झालं? त्यानंतर कोणीतरी दत्तक घेतलं काय झालं त्याचं? गाजराचं राजकारण, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दोन गोष्टींचा खास आनंद होत आहे. सभांना महिलांची संख्या जास्त आहे. मला नाशिकला आल्यावर तरुण-तरुणी जास्त दिसताहेत. आता जर निवडणूक झाली तर एकच रंग दिसेल तो म्हणजे भगवा भगवा. आता काहीजण म्हणतील कोणाचा भगवा? बातम्यांमध्ये बघतो ठाकरे गट. कोणता गट नाहीये. एकच गट तो म्हणजे शिवसेना. जी माझ्या समोर आहेत. मी दिसतो त्यांना बघून घ्या बाकीच्यांना नंतर भेटेन. काय गुवाहाटीला जाणार नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला आहे.
गद्दार जे सुरुवातीला सुरतला गेले. त्यानंतर गुवाहाटीला आणि त्यानंतर गोवा आणि त्यानंतर महाराष्ट्रात आले. 50 खोके घेतले नाही म्हणून ते सांगतील. या गद्दारांना त्यांच्या मतदारसंघात फिरता येत नाहीये. विधानसभेत 50 खोके म्हटलं की ते गद्दार एकदम ओके म्हणतात. कधी 39 खोके म्हणतात. कधी 72 खोके म्हणतात. पण, कधी ते खोके घेतले हे नाकारत नाहीत.
आपल्याकडे स्वतःहून लोक येताहेत. पण, दुसरीकडे खोके वाटून-वाटून रिकामे झाले, पण लोक काही येईनात. मी चॅलेंज दिलं. राजीनामा द्या आणि निवडणूक लढा. तुम्ही मुख्यमंत्री आहात, त्यांच्यामागे महाशक्ती आहे. मी एक साधा आमदार आहे. माझ्याकडे ना केंद्र सरकार आहे, ना राज्य सरकार आहे. ना महापालिका. माझ्याकडे केंद्रीय यंत्रणा नाहीये. की तुमच्यावर दबाव टाकू शकतो.
एवढं चॅलेंज दिल्यानंतर आयटी सेलवाले मला शिव्या देऊ लागले. मला द्या शिव्या मी ते टॉनिक समजतो. पण शिव्या कोणाला देताय? हे रक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. केंद्रीय मंत्र्यांपासून मला शिव्या देताहेत पण मुख्यमंत्री यावर काही बोलेना. एवढंच असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, मी पण देतो ठाण्यातून निवडणूक लढवू. तिथे पण आपणच जिंकू. ठाण्यात आजही शिवसेनाच आहे.
नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वी काहींनी ब्लु प्रिंट आणली त्याचं काय झालं? त्यांत मेट्रो आणणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर कोणीतरी दत्तक घेतलं काय झालं त्याचं? गाजराचं राजकारण एवढं झालंय की काय बोलणार, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. मी काही दत्तक घेणार नाही मी काही मोठा नाही. पण, नाशिकसाठी नेहमी काम करेन, असे त्यांनी म्हंटले आहे.