अजित पवारांच्या घरातच वाद विकोपाला, राष्ट्रवादी सांभाळा; पडळकरांचा इशारा
पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काहींनी सत्यजीत यांना मदत केली असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडले होते. या विधानावरुन गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. अजित पवारांच्या घरातच वाद विकोपाला गेला आहे. अजित पवार यांनी भाजपची चिंता करू नये राष्ट्रवादीची चिंता करा, असे त्यांनी म्हंटले आहे.
निकालावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुरळून जाऊ नये. कोकणात आम्हाला चांगलं यश मिळालं आहे, नागपूरच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. जुन्या पेन्शनचा मुद्दा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निर्माण केला होता, असा आरोप त्यांनी केला आहे.
अजित पवारांकडे आता काहीच शिल्लक उरलेलं नाही. अजित पवारांच्या घरातच वाद विकोपाला गेला आहे. लोकांचे प्रश्न सोडवायला त्यांना वेळ मिळत नाही. अजित पवार काय बोलतात त्याला फार महत्त्व नाही. अजित पवार अजून घोडा मैदान लांब नाहीये, विधानसभा, लोकसभा निवडणूक येत आहे. एखादा विजय मिळाला म्हणून अजित पवारांनी हुरळून जाऊ नये. अजित पवार यांनी भाजपची चिंता करू नये राष्ट्रवादीची चिंता करा राष्ट्रवादी सांभाळायचं बघा, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी नारायण राणेविरोधात मानहानीचा दावा केला आहे. यावर गोपीचंद पडळकर यांनी नारायण राणे आणि त्यांची मुलं ज्या पद्धतीने आणि जात ताकतीने शिवसेनेचा बाजा वाजवत आहेत. ते त्यांच्या जिव्हारी लागलं आहे. नोटिशीला कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ, असे म्हंटले आहे.