पंतप्रधान मोदी विषारी साप; खर्गेंच्या टीकेला भाजपचे उत्तर, खासदारकी गेली घर गेले पण...
मुंबई : कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची पंतप्रधान मोदींवर टीका करताना जीभ घसरली आहे. खर्गेंनी पंतप्रधान मोदींना विषारी साप म्हणत टीका केली. यावरुन आता राजकीय वातावरण तापले असून भाजपने कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. सत्ता गेली, राज्ये गेली, मतदार गेले, समर्थक गेले, नेते गेले, खासदारकी गेली, घर गेले पण डोक्यातली विकृत विचारांची मस्ती जात नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल वारंवार वाईट बोलतात. कर्नाटक निवडणुकीत खर्गेंनी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या. गांधी परिवाराला मोदींबद्दल आकस आहेच. 'मौत का सौदागर' पासून सुरु झालेला काँग्रेस नेत्यांचा पोटशूळ आज 'जहरीला साप’ इथंपर्यंत पोचला. यांना कधीच चांगले शब्द सापडत नाहीत. बोलताही येत नाहीत. त्यांच्या शब्दकोशातच नाहीत. त्यांची सत्ता गेली, राज्ये गेली, मतदार गेले, समर्थक गेले, नेते गेले, खासदारकी गेली, घर गेले पण डोक्यातली विकृत विचारांची मस्ती जात नाही, अशा शब्दात बावनकुळेंनी खर्गेंवर टीका केली आहे.
शिव्या पडतात, वाईट बोलले जाते म्हणजे मोदींच्या वादळात काँग्रेसचा केरकचरा उडून जाण्याची वेळ नक्की झाली हाच याचा अर्थ ! मोदींची लाट काँग्रेसचे कान, नाक आणि डोके बधिर करत आहे. खर्गेंनी लक्षात घ्या, आम्ही जनतेच्या भल्यासाठी भारताच्या 'अमृतकाळाचे' भान ठेवतो. तुम्ही अमृतकाळात "विषाची" आठवण ठेवता. तुमची संस्कृती विष पेरण्याची, समाजाला विभाजीत करण्याची आहे. म्हणूनच तुम्हाला विष आठवते. तुम्हाला कर्नाटकी जनता माफ करणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे?
पंतप्रधान मोदी हे 'विषारी सापा'सारखे आहेत, तुम्ही विचार करू शकता की ते विष आहे की नाही, तुम्ही ते चाटले तर तुमचा मृत्यू होईल, असे खर्गेंनी म्हंटले होते. यावर राजकीय वर्तुळात टीका झाल्यानंतर खर्गेंनी स्पष्टीकरण दिले आहे. याचा अर्थ पंतप्रधान मोदी असा नव्हता तर भाजपची विचारधारा सापासारखी आहे, असा माझा अर्थ होता. मी हे पंतप्रधान मोदींसाठी वैयक्तिकरित्या कधीच बोललो नाही, मी म्हणालो की त्यांची विचारधारा सापासारखी आहे आणि जर तुम्ही त्याला स्पर्श केला तर तुमचा मृत्यू निश्चित आहे, असा खुलासा त्यांनी केली आहे.