सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? छगन भुजबळ यांचे विधान
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. अशातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. हे सर्व सुरु असताना राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मोठे विधान केले आहे. सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? किती लोकांना त्यांनी शिक्षण दिले? जर त्यांनी शिक्षण दिले तर मग महात्मा फुलेंना का पाऊल टाकावे लागले? असे विधान भुजबळांनी पुण्यात बोलत असताना केले आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? किती लोकांना त्यांनी शिक्षण दिले? जर त्यांनी शिक्षण दिले तर मग महात्मा फुलेंना का पाऊल टाकावे लागले? ब्राम्हण समाजात फक्त पुरुषांना शिक्षण दिले जायचे. ते ही महिलांना शिक्षण देत नव्हते. म्हणून म्हणतो मी फक्त सरस्वतीची पूजा का? त्यामुळं सावित्रीबाई फुलेंना स्थान द्या, असे वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळांनी केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता गणपतीचं अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात आणलं. उद्या शंकर, पार्वती, तीस कोटी देवाचाही अभ्यास सुरु करा. बाकीचे शिक्षण बंद करा. हेच शिकत बसलंं कशा नोकऱ्या लागतील. हे सगळं मुद्दाम केलं जातं आहे. यांच्याविरोधात आवाज उठवावा लागेल. कोणाची परवानगी नसताना हा प्रकार सुरु आहे, असे ते यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येक ठिकाणी असतो याचा आम्हाला आनंद आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना स्थान आहे. त्याबाबत ही काही दुमत नाही, पण महात्मा फुलेंच्या बाबतीत असं घडत नाही. ते दुर्लक्षित असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे लवकरच भिडे वाड्याची अवस्था सुधारण्याबाबत सरकारशी चर्चा करणार आहोत. या वाड्याच्या सुधारणेसाठी सरकारकडे मागणीदेखील करणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.