सकाळी 9 वाजता टीव्ही लावला की..., साहित्य संमेलनातून फडणवीसांचा राऊतांना टोमणा
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप होत असतानाच शिवसेनेत झालेल्या बंडखोरीपासून भाजप- शिंदे गट विरुध्द ठाकरे गट असा संघर्ष देखील दिवसांदिवस वाढतच चालला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे भाजपसह शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. सर्वच मुद्द्यावरून राऊत हे भाजपवर टीका करत असतात. त्यातच आता यावरूनच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले देवेद्र फडणवीस?
वर्ध्यात सध्या 96व्या मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. याच संमेलनाचा आज आज समारोप होत आहे. त्यासाठी आज देवेंद्र फडणवीस हे देखील मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित होते. यावेळी बोलत असताना फडणवीस म्हणाले की, साहित्याच्या व्यासपीठावर आम्ही इतके राजकारणी काय करतो असा प्रश्न नेहमी विचारला जातो. पण, माझे उत्तर वेगळे आहे. आम्ही राजकारणी अनेक साहित्यिकांची प्रेरणा आहोत. आम्ही नसलो तर व्यगंचित्र काढणाऱ्यांना फार काही काम उरणार नाही. आमच्यातही साहित्यिक फार आहेत. काही शीघ्रकवी आहेत. काही यमक जुळविणारे आहेत. काही स्टोर्या लिहिणारे लेख आहेत, काही स्क्रिप्ट लिहिणारे आहेत. सकाळीच 9 वाजता टीव्ही लावला की आमच्यातील साहित्य ओसंडून वाहते. असा खरमरीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना लगावला आहे.
पुढे ते म्हणाले की, विचारांची अभिव्यक्ती करण्यासाठी माध्यमे खूप वाढली आहेत. सोशल मीडियामुळे नवं साहित्य तयार झाले आहे. पण, नवं माध्यमाचा संक्रमण काळ सुरु आहे. त्याला खोली नाही, उंची नाही. काही काळात तसे साहित्य तयार होईल. पण, पुस्तकामधून जी काही साहित्य पेरणी होते ती दीर्घकाळ कायम राहते. दर्जेदार पुस्तक वाचणे, त्यातून ज्ञान घेणे हे आपले काम आहे. मराठीला वेगळ्या उंचीवर पोहोचवणारे अनेक साहित्यक आहेत. त्यामुळे मराठी भाषा आपला दर्जा टिकवून आहे. असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.