...तर राजकारणात राहण्याचा अधिकार नाही; केसरकरांचे आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. यावरुन आदित्य ठाकरेंनी आज वरळीत तुम्हाला गल्लीगल्लीत फिरायला लावेल, अशी जोरदार टीका शिंदे-फडणवीसांवर केली होती. याला शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गल्लीत फिरण्याची लाज वाटत असेल तर राजकारणात राहण्याचा अधिकार नाही, असा निशाणा केसरकरांनी आदित्य ठाकरेंवर साधला आहे.
नेहमी नेहमी बोलत राहिले की त्यातली मज्जा निघून जाते. ज्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील लोक न्याय मागत होते, तेव्हा ते न्याय देऊ शकले नाही. म्हणून कोळी बांधव मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागण्यासाठी आले. कोळीबाधवांना सत्कार करण्याला गल्ली गल्लीत फिरणे असे म्हटले तर काही फरक पडत नाही. मच्छिमार बांधवांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही त्यांना इलेक्ट्रॉनिक व्हेईकल देत आहोत. त्या गल्लीमध्ये फिरण्यासाठी आणि वृद्धांना जाण्यासाठी आम्ही व्हेईकल देत आहोत, असा टोला दीपक केसरकारांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
मला तुलना करायची नाही. मुख्यमंत्री मुळचे मुंबईचे रहिवासी आहेत. त्याला गल्लीमध्ये फिरणं म्हटले तर हरकत नाही. त्या गल्लीला कमीपणा मानण्याची गरज नाही. ती आमची संस्कृती आहे. हे मतांसाठी कोळी महोत्सवात जातात. आम्ही त्यांना रोजगार मिळवून देणार आहोत. ज्यांना गल्लीत फिरण्याची लाज वाटत असेल त्यांना राजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशीही टीका त्यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मतदार संघात येऊन सभा घेतायत हाच माझा विजय आहे. जेव्हा फुटबॉलची मॅच असते तेव्हा मेस्सी आणि रोनाल्डोच्या बाजूला चार-पाच खेळाडू लावले जातात. सचिन तेंडुलकर यांच्यासाठी देखील वेगळी रणनिती आखली जाते. आता सभा घेतायत घ्या. वरळीत तुम्हाला गल्लीगल्लीत फिरायला लावेल, तरीही विजय माझाच आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना लगावला होता.