देवेंद्र फडणवीसांचा टिळक कुटुंबियांना फोन, सांभाळून घ्या...
पुणे : मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ मतदार संघात टिळक कुटुंबियांना उमेदवारी देण्यात येईल, अशी शक्यता होती. मात्र, भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यामुळे टिळक कुटुंबिय नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यावरुन, पुण्यात फ्लेक्सबाजीही करण्यात आली. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करत टिळक कुटुंबियांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला आहे.
हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत कसबा पेठ पोटनिवडणुकीचा अर्ज भरला. परंतु, यावेळी टिळक कुटुंबिय गैरहजर राहील्याने नाराजीच्या चर्चांना वेग आला. यानंतर देवेंद्र फडणवीसांचा टिळक कुटुंबियांना फोन करत नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला. कुणाल टिळक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दिवसभरात दोन वेळा फोनवरुन चर्चा केली. सांभाळून घ्या, पोटनिडणुकीत सक्रिय प्रचार करा, अशी विनंती फडणवीसांनी टिळक कुटुंबियांना केली आहे. फडणवीस अणि बावनकुळे यांच्या समजुतीनंतर कुणाल टिळक आणि शैलेश टिळक प्रचारात सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान, पक्षामध्ये कधीही जाणीवपूर्वक कोणालाही डावलण्यात येत नाही. उद्या ३ वाजेपर्यंत महाविकास आघाडीने जर ही निवडणूक बिनविरोध केली तर आम्ही उद्या रासने यांचा अर्ज माघारी घेऊ. आणि टिळक कुटुंबियांना उमेदवारी देऊ, अशी ऑफर चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला दिली आहे.