अजित पवारांच्या 'त्या' विधानावर फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, त्यांच्या विचारांच्या...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. याच दरम्यान काल नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बाल शौर्य पुरस्कार देण्याची भूमिका मांडली. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे. असे विधान त्यांनी केले होते. त्यावरूनच आता राजकीय वर्तुळात एकाच वादंग निर्माण झाला आहे. यावरूनच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले फडणवीस?
छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले, धर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म यांचे रक्षण केले. त्यांना औरंगजेबाने का मारलं? संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले गेले, पण त्यांनी मान्य केले नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी हालअपेष्टा होऊन त्यांचे बलिदान झाले. त्यांच्या शरिराचे अक्षरशः तुकडे केले. तरी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वधर्म, स्वराष्ट्राची भाषा सोडली नाही. म्हणून अजित पवार आणि त्यांच्या विचारांच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच पण ते धर्मवीर देखील होते. असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
काय म्हणले होते अजित पवार?
महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असे अजित पवार कल म्हणाले होते.