तुम्ही मातोश्रीपासून वरळीपर्यंतही गेला नाहीत अन् मोदींना...; फडणवीसांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेला जायला वेळ आहे, मात्र मणिपूर जळतंय तिकडे जायला वेळ नाही, असा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला होता. याचा समाचार आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मातोश्रीपासून वरळीपर्यंत जे गेले नाहीत ते मोदींना मणिपूरला जा हे कोणत्या अधिकारात सांगत आहेत? असा खोचक प्रश्न फडणवीसांनी उध्दव ठाकरेंना विचारला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक नेते म्हणाले की आमचे विश्वगुरु अमेरिकेला चाललेत त्यांना मणिपूरला जायला वेळ नाही. मी त्यांना एवढंच सांगतो की मणिपूर सांभाळायला आमचे गृहमंत्री अमित शाह पुरेसे आहेत. तुम्ही मातोश्रीपासून वरळीपर्यंतही गेला नाहीत इकडे मोदींना सांगता अमेरिकेला न जाता मणिपूरला जा. हे सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का?
उध्दव ठाकरे म्हणालेले की लस काय मोदी तयार करतात का? मग उद्धव ठाकरे रोज सांगायचे मी राज्य चालवतो म्हणजे काय ते घोड्यावर, रथावर बसून हाकत होते का? की बैलबंडी हाकत होते, असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्रात साडेसतरा कोटी लसी मोफत मोदींनी पाठवल्या. कोव्हिडची लस दिली नसती तर आपण इथे बसू शकलो असतो का? असेही फडणवीसांनी म्हंटले आहे.