जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक, संप मागे घ्या; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 18 लाख कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. यावरुन आज सभागृहात राजकीय वातावरण तापलेले दिसून आले. विरोधकांनी शिंदे-फडणवीसांवर टीकेची झोड उठवली. याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, अशी माहिती दिली आहे. तसेच, कर्मचाऱ्यांनी आजच संप मागे घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. याबाबत चर्चेतूनच मार्ग निघेल आहे. काही संघटनांनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेतल्यावर आर्थिक परिणाम काय होईल याचा विचार करण्याची गरज आहे. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित, आरोग्यजन्य, सन्मानने जगता यावे हे राज्य सरकारला तत्वतः मान्य आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली आणि जुनी निवृत्ती योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती तीन महिन्यात राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये सुबोध कुमार, के.पी. बक्षी, सुधीर कुमार श्रीवास्तव असतील, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
ज्यांच्या काळात पेन्शन योजना बंद झाली तेच आज आंदोलनात सामील होतात. सध्या कार्यरत कर्मचारी निवृत्त झाले तरी लाभ मिळणार आहे. तरी त्यांनी संपाचा निर्णय घेतला. सरकार सकारात्मक आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये. चर्चेतून मार्ग निघेल कर्मचाऱ्यांनी आजच संप मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईकडे मार्गस्थ झाला आहे. लाल वादळ पुन्हा एकदा मुंबईला धडक देण्यासाठी सज्ज झाले. शेतमालाला मिळत नसलेले भाव, कांदा आणि अनेक अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी म्हणाले की, शेतकरी आंदोलनावर उद्या बैठक आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. यात कोणीही राजकारण करू नये. शेतकऱ्यांच्या बैठकीत सगळेच असतील, असे त्यांनी सांगितले.