महाशक्ती पाठीशी असताना सरकारला जुनी पेन्शन लागू करायला हरकत काय ? उध्दव ठाकरेंचा खोचक सवाल
मुंबई : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 18 लाख कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र, राज्य सरकारी- निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र या संघटना सहभागी आहेत. यावर उध्दव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. इतकी मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे, असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.
जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. सरकारला टाळे ठोकले आहे. सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? मुख्य म्हणजे इतकी मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारला आर्थिक भार वाढण्याची चिंता नसावी, असा टोला उध्दव ठाकरेंनी लगावला आहे. सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना ठाम पणे ऊभी आहे. देशातील काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. मग फडणवीस-मिंधे सरकार याबाबत आट्या पाट्या का खेळत आहे? जे हक्काचे आहे ते कर्मचाऱ्यांना मिळालेच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक घेण्यात आली. परंतु, या बैठकीत कोणातही तोजगा निघाला नाही. अखेर आज 18 लाख कर्मचारी आजपासून संपावर गेले आहेत. एकच मिशन जुनी पेन्शन ही घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपात सहभागी असल्यानं कार्यालयांत शुकशुकाट होता. मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोनल करणार असल्याचा निर्धार प्राध्यापक व कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेते हे बघणं सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे.