'...तर महाराष्ट्रात राहुल गांधींच्या केसाला सुद्धा हात लावून दाखवावं'
नागपूर : राहुल गांधींनी आधी माफी मागावी, मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवावं, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. या आव्हानावरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपात धमक असेल तर महाराष्ट्रात राहुल गांधींच्या केसाला सुद्धा हात लावून दाखवावं, असे नाना पटोले यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले आहे. ते भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे पत्रकारांशी बोलत होते.
मी सावरकर नव्हे, राहुल गांधी आहे. हा गुन्हा होत असेल तर हा गुन्हा मी वारंवार करत राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचा अपमान केला. त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली का? महाराष्ट्राचे आधीचे काळी टोपीवाले राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. त्यांनी माफी मागितली काय, असे प्रश्न नाना पटोलेंनी बावनकुळेंना विचारले आहेत. तसेच, जर भाजपात धमक असेल तर महाराष्ट्रात राहुल गांधींच्या केसालासुद्धा हात लावून दाखवावं, असा खुले आव्हान त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या पक्षातही काही किंमत नाही, ते राहुल गांधींना काय रोखणार? राहुल गांधींना जेव्हा महाराष्ट्रात यायचे त्यावेळी ते येणारच व काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या धुमधडाक्यात त्यांचे स्वागत करतील. राहुल गांधी यांना महाराष्ट्रात येण्यासाठी भाजपा, बावनकुळे किंवा कोणाच्या परवानगीची गरज नाही, अशी टीकाही पटोलेंनी केली आहे.
दरम्यान, राहुल गांधी लवकरच मातोश्री वर येणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला होता. सावरकरांची राहुल गांधींनी अवहेलना केली, त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केलाय. महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी, त्यानंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा. असे बावनकुळे म्हणाले.