...म्हणूनच राष्ट्रपती मुर्मूंच्या हस्ते संसदेचे उदघाटन नाही; आंबेडकरांचा दावा
पुणे : संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरुन राजकारण आता चिघळले आहे. या उद्घाटनाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर, विरोधकांनी उदघाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. यामध्ये आता वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतली असून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
भाजप आणि आरएसएस वैदिक धर्माला मानणारी आहे. या धर्मात महिला आणि आदिवासी यांना कुठलेही स्थान नाही. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एक आदिवासी महिला आहे. त्याचमुळे त्यांच्या हस्ते याचे उद्घाटन केलं जात नाही, ही फार दुर्दैवी बाब आहे, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.
याआधीही प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा साधला होता. मोदी प्रचंड प्रसिद्धीसाठी हावरट आणि हपापलेले आहेत. उद्घाटनाच्या दगडावर फक्त माझंच नाव हवं असा त्यांचा हेतू असतो. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सत्ता गेली आणि आम्ही सत्तेत आलो तर संसद भवनाचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुन्हा उद्घाटन करू. पंतप्रधान मोदी यांच्या नावाची संसद भवनावरील नेम प्लेटही काढून टाकू, असे आंबेडकर म्हणाले होते.