संतोष बांगरांची मंत्रालयाच्या गेटवर पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ? म्हणाले...
मुंबई : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. मंत्रालयात जाताना गेटवरील पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे आता पुन्हा संतोष बांगर विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.
संतोष बांगर त्यांच्या कार्यकर्त्यांसह 27ऑक्टोबर रोजी मंत्रालयात गेले होते. यावेळी गेटवर पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना अडवले. पोलीस कर्मचाऱ्याने कार्यकर्त्यांचा पास काढण्यास सांगितले. यामुळे संतोष बांगर संतापले व त्यांनी त्या कर्मचाऱ्यासोबत वाद घातला आणि आपल्याला ओळखत नाही का? अशी विचारणा केली. याबाबतची तक्रार पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र, संतोष बांगर यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
या घटनेवर संतोष बांगर यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. ते म्हणाले, मी कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली नाही. कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात असताना तेथील पोलीस कर्मचाऱ्याने डायरीत प्रवेशाची नोंद करण्यास सांगितलं. यावेळी एका कार्यकर्त्याने सोबत आमदार असल्याचं सांगितलं. त्या कर्मचाऱ्याने मला ओळखलं नव्हते. पण, ओळखल्यानंतर सन्मानाने मला आत पाठवले. माझ्या पीएने नंतर डायरीत नोंद केली. हुज्जत घातली असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासा, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, याआधीही संतोष बांगर अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत डबे पुरवणाऱ्या गोडाऊन व्यवस्थापकाला त्यांनी मारहाण केली होती. यानंतर एका उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ आणि मारहाण केल्यानेही ते वादात अडकले होते.