कबर औरंगजेबाची हिंमत कोणाची? शिंदे गट v/s ठाकरे गट रंगला वाद; थोपटले दंड
वसीम अत्तर | सोलापूर : औरंगाबादमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून सोलापूरात चांगलेच राजकारण पेटलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून शिवसेना (ठाकरे गट) व शिंदे गट आमने-सामने आले असून दोन्ही गटाच्या जिल्हाप्रमुखांनी दंड थोपटले आहे. यामुळे राज्यात पुन्हा नवा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत.
एकीकडे उद्धव ठाकरे गटाचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे हिंदुत्ववादी असले तर औरंगाबादमधील औरंगजेब यांची कबर पाडून त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक बांधावे, असे आवाहन केले आहे. त्याला प्रत्युत्तर देत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी ठाकरे शिवसेना गटाचे हिंदुत्व संपलेले आहे. मागील साडेसात वर्षात पहिली पाच वर्षे फडणवीस-ठाकरे सरकार होते. नंतर अडीच वर्षे सोनिया-पवार-ठाकरे सरकार होते. तेव्हा तुम्ही बोलण्याची हिंमत दाखवायला पाहिजे होती. तेव्हा तुमच्यातील शिवसैनिक जिवंत दिसला असता. तुमच्याकडे हिंदुत्ववादी माणसे राहिली नाहीत. आणि सेक्युलर लोक तुम्हाला जवळ स्वीकारायला तयार नाहीत, असा आरोप शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान, याआधीही औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण रंगले होते. एआयएमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादेत औरंगजेबाच्या कबरीवर गेले होते. याठिकाणी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला वंदन करत फूल वाहिली. यावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. यानंतर औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा कबरीवरुन वाद उफाळला आहे.