सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! शिंदे सरकार पाच दिवसांचा आठवडा करणार रद्द?
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने एकिकडे कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट दिलं असून ऑक्टोबरचं वेतन दिवाळीपूर्वीच होणार आहे. तर, दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा आता रद्द होणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
केंद्राप्रमाणे राज्य शासकीय कार्यालयांनाही कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करावा, ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने मान्य केली होती. यानुसार 5 दिवसांच्या आठवड्यात सोमवार ते शुक्रवारपर्यंत सरकारी कामे केली जात आहेत. तसेच शनिवार व रविवार असे दोन दिवस आठवडी सुटी आहे. परंतु, शनिवारी सुट्टी असल्याने कर्मचारी शुक्रवारपासूनच कार्यालयातून गायब असल्याच्या अनेक तक्रारी सर्वसामान्यांमधून करण्यात येत होत्या. तसेच, त्यांच्या कार्यपध्दतीवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर शिंदे सरकार ५ दिवसांचा आठवडा रद्द करण्याची शक्यता आहे. या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केल्याची माहितीही मिळत आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. अशात शिंदे सरकारचा हा निर्णय कर्मचाऱ्यांचा रोष ओढावू शकतो.
दरम्यान, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी मोठा दिलासा होता. दिवाळीपूर्वीच 21 तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात यावेत असा आदेश सर्व आस्थापनांना देण्यात आला आहे. अशा प्रकारची मागणी या आधीच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.